अजितदादांचा कित्ता शिंदे गिरवणार का?

नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते विकास महामंडळ यासारखे शहरी पट्ट्यावर प्रभाव राखू शकतील, अशी मंत्रिपदे स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा गृह जिल्हा असणाऱ्या ठाण्याचे पालकमंत्रिपद राखण्यात यश मिळेल का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. भाजपची साथ घरत महायुतीत सहभागी झालेले अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे राखले होते. उपमुख्यमंत्रिपदासोबत पुण्याचे पालकमंत्रिपद पटकावत या भागातील राजकारणावर वरचष्मा राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहोला होता. शिंदे यापुढे पवारांचा कित्ता गिरवतात का, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे विभाग मिळवक्त शिंदे यांनी भाजपसोबत केलेल्या वाटाघाटीत काही प्रमाणात का होईना, यश मिळवले आहे. राज्याचे नगरविकास विभागाचे मंत्रिपद मिळवताना गृहनिर्माण विभागही पदरात पाडून घेत शहरी पट्ट्यावर प्रभाव राहील, अशा पद्धतीची आखणी शिंदे यांच्या गोटात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असताना मुंबई महानगर विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ यासारख्या प्राधिकरणांच्या अखत्यारित ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील हजारो एकर जमिनीच्या विकासाचे अधिकार सोपविण्यात आले आहेत. सिडकोसारख्या शासकीय मंडळाकडे ठाणे आणि आसपासच्या प्रदेशातील शहरांमधील बेकायदा वस्त्यांच्या समूह विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रस्ते विकास महामंडळाला महाबळेश्वर, कोकण प‌ट्ट्यातही नियोजनाचे अधिकार सोपवून शिंदे यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा यापूर्वीच स्पष्ट केल्या आहेत. नव्या सरकारमध्ये हे विभाग शिंदे पुन्हा एकदा स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरले असले तरी एमएमआरडीए, एमएसआरडीसी यासारख्या विभागांकडून नवनगरांचा होत असलेल्या या विकासाच्या प्रारुपाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आगामी काळातील भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशाचे केंद्रस्थान असलेला ठाणे जिल्हा यापुढील काळातही राजकीय आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या केंद्रस्थानी रहाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद प्रतिष्ठेचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असताना त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांचे विश्वासू मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपविले होते.

शिंदे पिता-पुत्रांचा जिल्ह्यावर पूर्ण प्रभाव असल्याने देसाई यांचे पालकमंत्रिपद नामधारी ठरले होते. भाजपने यंदाच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक या एकमेव चेहऱ्याला संधी दिली आहे. नाईक यांनी १३ वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाईक यांच्या फारसे राजकीय सख्य कधीच दिसले नाही. या परिस्थितीत नव्या रचनेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राखण्यात शिंदे यशस्वी ठरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्रिपद राखण्यात शिंदे यशस्वी ठरले तर ते स्वतःकडे हे पद ठेवतात का, याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या वर्षात होण्याची शक्यता असून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईदर यासारख्या शहरांमध्ये शिंदे यांच्या पक्षाला भाजपकडूनच आव्हान उभे राहील, अशी शक्यता अधिक आहे. नवी मुंबईत नाईक आणि शिंदे समर्थकांमध्ये सख्य नाही. कल्याण पट्टीत खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात स्पां आहेच. ठाण्यात भाजप शिंदे यांच्या प्रभावापुढे पक्ष वाढीसाठी धडपडतो आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्याप्रमाणे गृह जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे राखून ठेवत शिंदे राजकीय प्रभाव कायम राखण्याचा प्रयत्न करु शकतील, असा त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.