दर नसल्याने कलिंगड उत्पादक संकटात उत्पादन खर्चही निघेना, वाढत्या उन्हात शेतकर्‍यांची होरपळ

सोलापूर:- यंदा सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. सूर्य आग ओकत आहे. तापमानाची उच्चांकी नोंद होत असताना गारवा देणार्‍या कलिंगड उत्पादक शेतकर्‍यांना बाजारपेठेने चांगलाच घाम फोडला आहे. दर नसल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याची वेळ आल्याची कैफियत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुर्देवाडी येथील शेतकरी भैरप्पा पाटील यांनी मांडली. पाटील या शेतकर्‍याने 2 एकर कलिंगडची लागवड केली. त्यासाठी दोन लाखांपेक्षाही अधिक खर्च आला. मात्र, 5 ते 7 रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने नफा दूरच बियाणे, मशगत, लागवड आणि औषधांचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. एका आघाडीच्या सुपर स्टोअरकडून आर्डर मिळाल्याचा मोठा आनंद पाटील यांना झाला होता. त्यांनी ट्रकभरून कलिंगड मुंबईला पाठ. मात्र, हा आनंद अल्पजीवी ठरला. कारण दर एकदम कमी केल्याने स्टोअरकडून फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे सांगताना पाटील यांचे डोळे पाणा नंतर नवी मुंबई बाजारपेठेत 10 रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर मिळाल्याने गाडीचे भाडे आणि इतर खर्चही निघाला नाही. तोच अनुभव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही आला. बाजार समितीमध्ये केवळ 5 ते 7 रुपये प्रतिकिलो दर असल्याचे समजले. व्यापार्‍यांनी 20 रुपये कॅरेटप्रमाणे मागणी केली. त्यामुळे आपला मुलगा सिध्दारामसह आलेल्या पाटील यांनी थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. जुळे सोलापुरातील डीमार्टच्या रस्त्यावर त्यांनी दुकान मांडले. शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री केल्याने उत्पादन खर्चापैकी काहीतरी हाती लागेल ही त्यांनी अपेक्षा आहे. दरम्यान, टेम्पो घेऊन कलिंगड विकण्यासाठी आलेल्या या शेतकर्‍याच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. कारण त्या परिसरातील विक्रेत्यांनी आणि इतर काही जणांनी रस्त्यावर कलिंगड विकण्यासाठी विरोध केल्याचे पाटील यांनी सांगितले. ही केवळ पाटील यांचीच कथा नसून यंदाच्या हंगामातील कलिंगड उत्पादक शेतकर्‍यांची आहे. एकीकडे पारा 42 अंश पार करून उच्चांकी तापमानाची नोंद होत असताना गारवा देणार्‍या कलिंगड आणि टरबूज या फळांना दर नसल्याने शेतकर्‍यांची होरपळ होत आहे.


 गावोगाव फिरून विकण्याचा संकल्प मोठ्या अपेक्षेने कलिंगड लावले आहे. त्यासाठी दोन लाख खर्च झाला. साखळी सुपर मार्केटकडून फसवणूक झाली. बाजार समितीमध्ये कवडीमोल दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्च मिळणे शक्य नाही. त्यामुळे औषध आणि खतांसाठी केलेला खर्च मिळवण्यासाठी गावोगावी फिरून विकण्याचा आपला संकल्प आहे. मार्केट कमिटी अथवा नशिबाला दूषण देत न बसता आपण थेट ग्राहकांकडे साकडे घालणार असल्याचे भैरप्पा पाटील यांनी सांगितले.