हिवाळ्यात हृदयविकाराला निमंत्रण
.jpeg)
हिवाळा ऋतू तसा आल्हाददायक आहे; पण हवामानात बदल झाला की, अनेक आजार डोके वर काढू लागतात. सध्या अशा वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. आता हृदयविकाराच्या रुग्णांना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यामध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसते. या दिवसांमध्ये हवामानातील तापमान घटते. कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणार्या धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते. रक्तपुरवठा मंदावतो, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. अशा स्थितीत रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो. थंड वातावरणामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे कठीण होते. अशा परिस्थितीमध्ये हायपोथर्मिया होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना असते. बाहेरचे तापमान थंड असेल तर शरीराची मज्जासंस्था सक्रिय होते. ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात ज्याला ‘व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन’ म्हणतात. रक्तदाब अचानक वाढतो आणि शरीरात असलेल्या इतर अवयवांना रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते आणि हृदयविकाराचा झटका येतो. हवामानासाठी अनुकूल कपडे परिधान करा. असे केल्याने उबदार राहण्यास आणि हिवाळ्यात हृदय सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. टोपी, हातमोजे आणि स्वेटर घाला. रोजच्या शारीरिक हालचालींमुळे प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच व्यायाम करा. रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगा, संपूर्ण धान्य, बेरी, शेंगा, फ्लॅक्ससीड्स, पालक, गाजर, ब्रोकोली खा. गरम सूप प्या. जंक, मसालेदार, तेलकट, हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ टाळा.
डॉ. कुंदन गायकवाड