जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांसाठी चुरशीने मतदान सुरू; किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान; सकाळच्या सत्रात 20 टक्के मतदान झाल्याचा अंदाज
सोलापूर: जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी आज
मंगळवारी चुरशीने मतदान सुरू झाले. किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान सुरू आहे.
बार्शी मोहोळ आणि इतर काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या कारणावरून काही
काळ मतदान ठप्प झाले होते. सकाळच्या सत्रात साडेबारापर्यंत सरासरी सुमारे 20%
मतदान झाल्याचा अंदाज आहे. आज मंगळवारी मतदान होत असले तरी त्याची मतमोजणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता बुधवार दिनांक 3 रोजी होणार होणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे
राजकीय पक्षासह उमेदवारा ंची चिंता वाढली आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार
मतमोजणी बुधवार दिनांक 3 रोजी होणार होती.
दहा नगरपरिषदांच्या 115 प्रभागांसाठी 900 उमेदवार
निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 4 लाख 3 हजार 812 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यामध्ये 2 लाख 1 हजार 54 पुरुष तर 2 लाख 2 हजार 666 महिलांचा समावेश आहे. सोलापूर
जिल्ह्यातील अकलूज, अक्कलकोट, मैंदर्गी,
दुधनी, पंढरपूर, बार्शी,
कुर्डूवाडी, मोहोळ, सांगोला
व करमाळा या नगरपरिषदांसाठी मतदान होत असून यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी
नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी 1322 बॅलेट युनिट व 661 कंट्रोल युनिटचा
वापर होणार आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान केंद्रात येणार्या सर्व मतदारांना
मतदानाची संधी देण्यात येणार असून, आवश्यक असल्यास मतदानाची
वेळ प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत वाढिण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर पाच
कर्मचारी आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. अक्कलकोट शहर
मैंदर्गी आणि दुधनी या कन्नड भाषिक बहुल परिसरात सीमा वरती भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नगरपालिकानिहाय मतदारसंख्या
बार्शी : 1,09,012
पंढरपूर : 94,559
अकलूज : 34,408
सांगोला : 33,698
अक्कलकोट : 38,442
करमाळा : 22,118
कुर्डूवाडी : 23,791
मोहोळ : 24,413
मैंदर्गी : 12,466
दुधनी : 10,905
कामगारांना सुट्टी द्यावी
निवडणूक असलेल्या नगरपरिषद क्षेत्रातील कामगार, अधिकारी व कर्मचा//र्यांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. मतदानासाठी
सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई होणार आहे. सुट्टी न दिल्याबाबत प्रकार
असल्यास त्यांनी दक्षता कक्षाशी संपर्क साधावा, असे सहायक
कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे यांनी सांगितले. अपवादात्मक सेवांमध्ये पूर्ण सुट्टी
शक्य नसल्यास मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत देणे बंधनकारक आहे, असेही येलगुंडे यांनी सांगितले.
दोनशे मीटर परिसरात निर्बंध मतमोजणी केंद्रात उमेदवार, प्रतिनिधी व कर्मचारी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्राच्या 200
मीटर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी असेल. मोबाइल, इलेक्ट्रॉनिक
उपकरणे, घोषणाबाजी, मिरवणूक, गुलाल उधळणे व डिजिटल फलकांस पूर्ण बंदी असून या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर
कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार
आशीर्वाद यांनी दिली.