बारामती पोट निवडणुकीतून काँग्रेसची माघार; मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर वेगवान घडामोडी

मुंबई: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवार असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेतृत्वाला फोन केल्याने वेगवान घडामोडी घडल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीच्या निवडणूक रिंगणातून काँग्रेस उमेदवार माघार घेत असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही काँग्रेसचे उमेदवार आकाश गोरे माघार घेणार असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्ज माघार घेण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने लढत अटळ मानली जात होती. अशा परिस्थितीत फडणवीसांनी थेट काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती फडणवीसांनी केली.

अचंबित करणारा क्षण

राज्यातील सत्ताधारी पक्षाचा प्रमुख नेता विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना थेट फोन करून निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, ही दुर्मिळ बाब मानली जात आहे. त्यामुळे या घटनेला राज्याच्या राजकारणातील अचंबित करणारा क्षण मानले जात आहे. फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेसची भूमिका बदलते का, याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या विषयावर काँग्रेसमध्ये विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. याआधी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेच काँग्रेसशी संपर्क साधल्याने या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.