राज्यात येत्या 3 दिवसांत काही भागात अवकाळी पावसाचा इशारा
.jpeg)
पुणे: उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेचा
परिणाम देशभरात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यात देखील थंडीचा जोर
चांगलाच वाढला आहे. मागच्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून बहुतांश
ठिकाणी 2 ते 4 अंशांनी तापमानात घट झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. हवामानशास्त्र
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या 24 तासांत किमान तापमान
वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची
शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. बुधवारी मराठवाडा, विदर्भात
तापमानाचा पारा चांगलाच घसरला. धुळ्यात किमान तापमान 4.4 अंशांवर पोहोचले होते.
उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात कमालीची घट झाली असून नागरिक थंडीनं कुडकुडले
आहेत. सध्या भारताच्या वायव्य भागात नव्याने पश्चिमी चक्रावात तयार झाला आहे. तर
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढण्यास मदत
होतेय. मागील दोन दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात
चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने 24 तासानंतर राज्यात पावसाला पोषक
हवामान तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि
मराठवाड्यात येत्या 24 तासात तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असून किमान
तापमान घसरणार आहे . विदर्भ वगळता उर्वरित
राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता
वर्तवण्यात आली आहे .विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा
जोर कायम राहणार असल्याचा सांगण्यात आलंय प्रादेशिक हवामान केंद्रानुसार 10
जानेवारी व 11 जानेवारी रोजी हा पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी
पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय.