भाजीपाला, फळे विक्रेते व फेरीवाला यांचा पालिका प्रशानाच्या विरोधात आक्रोश मोर्चा!

सोलापूर दि.११:- सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट, रेल्वे स्टेशन, नीलम नगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळीवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला, फळे विक्रेते, चारचाकी फेरीवाले हे आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात. त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल ४० वर्षापासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत. यासाठी ७० फुट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळे विक्री करत आहेत. यावर त्यांचे व त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे. परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर दोन-तीन महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते. कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न समिती बाजारामधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे व जीवनाश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उध्वस्त केले जाते. कारवाईच्या नावाने जप्त केले जाते. त्यामुळे त यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते. प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन कांही ऐकत नाही. यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची सक्रांत आहे. साहेब हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या, आमच्या पोटावर पाय देऊ नका. अन्यथा हि पोटातली आग डोक्यात जाईल. जर हा निर्णय नाही लागला तर ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त मा. मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत. त्यावेळी मा. मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठनेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी जाहीर सभेत दिला.  बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी लाल बावटा फेरीवाला चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना सिटू सलंग्न च्यावतीने ७० फुट भाजी मंडई वरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणा विरोधात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), माकपाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) व संघटनेच्या अध्यक्षा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली ७० फुट भाजी मंडई पासून ते संत तुकाराम चौक, पाथरूट चौक, पोटफाडी चौक, सिव्हील चौक, रंगभवन मार्गे, जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. तद्पुर्वी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. मा. सचिन ओंबासे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्यांसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चे अंती मा. आयुक्तांनी अल्पावधीतच संबंधित विभागांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी आश्वासित केले. यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, खाजाभाई करजगी, ॲड अनिल वासम, रुक्मिणी कवळे,शांताबाई कोळी, चाँद शेख, जाफर शेखसादिक बागवान, उर्मिला वाघमारे आदींची उपस्थिती होती.

 १. यावेळी ७० फुट भाजी मंडई येथे प्रत्यक्ष भाजीपाला विक्रेते यांनी आपली व्यथा मांडले. सादिक बागवान म्हणाले कि, सोलापूर महानगरपालिकामार्फत पर्यायी भाजी मंडई अशोक परिसरातील चिप्पा मार्केटची निर्मिती केली. हे चिप्पा मार्केट मुख्य बाजार पेठापासून दोन किलोमीटर आतमध्ये आहे. ज्या ठिकाणी ग्राहकांना जाणे गैरसोयीचे व जिकीरीचे आहे. नव्या पिढीला या चिप्पा मार्केटची माहिती सुध्दा नाही. सदर चिप्पा मार्केट या ठिकणी अवतोभोवती कारखाने असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असते. या चिप्पा मार्केट मध्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे तळीराम खुलेआम मद्यपान करतात, भांडणे होतात, आजमितीस दोनवेळा खून झाल्याची नोंद पोलीस ठाणे येथे आहे.

२. शांताबाई कोळी म्हणल्या कि, या परिसरात नेहमीच व्यसनी लोकांचे वावर असून महिला, वृद्ध व लहान मुले यांना या ठिकाणी येणे भीतीचे वाटते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमणात घाणीचे साम्राज्य असल्याने भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक यायला धजावत नाहीत.

३. जाफर शेख म्हणाले कि, फळे, भाजीपाला विक्रेते व फेरीवाले प्रशासन व अतिक्रमण विभागाकडे वारंवार तक्रारी नोंदविले, कारवाई थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र प्रशासनाने पुढाकार घेऊन चिप्पा मार्केट येथे भाजीपाला, फळे विक्रेते, फेरीवाला यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत ओटा बांधून दिले. त्याप्रमाणे या विक्रेत्यांनी तब्बल तीन महिने या ओट्यावर बसून व्यवसाय केले. मात्र नफ्या ऐवजी आणलेल्या भाजीपाला त्याच ठिकाणी फेकून देण्याची वेळ आली. व्यवसाय तोट्यात गेला. कर्जबाजारी झाले. कारण ग्राहक त्या मार्केटमध्ये फिरकत नव्हते, क्वचितच गरजू लोक त्या मार्केट मध्ये येत होते. त्यामुळे कोणाचाही व्यवसाय चालत नव्हता.

 ४. नूरजहाँ बागवान म्हणल्या कि, या ठिकाणी साधारणतः दोनशेहून अधिक विक्रेत्यांकडून दररोज २५ रुपये दंडाची पावती स्वीकारली जाते. तब्बल चाळीस वर्षापासून मी इथेच भाजीपाला विक्री करते, एकवेळ विष पिऊ किंवा फाशी घेऊ पण चिप्पा भाजी मंडईला जाणार नाही. यावेळी प्रास्ताविक करताना कॉ. युसुफ शेख म्हणाले कि, शहर फेरीवाला समिती व मंडई विभागाकडून झालेली कार्यवाही. (राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंतिम लाभार्थी निश्चित करणे. शासनाने उपविधी मंजूर करणे करिता सर्व महानगरपालिका यांना सूचित केले नूसार सोलापूर महानगरपालिका यांनी मा. सर्वसाधारण सभा ठराव. क्र. ८ दि. २०/०५/२००९ च्या मान्यतेने उपविधी लागू केलेला असून २००९ मध्ये गंडई विभागाकडून दिल्ली येथील एका संस्थेद्वारे फेरीवाले यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आलेली होती. तथापि ती पूर्ण होऊ शकली नाही. मंडई विभाग यांचे कडील उपलब्ध माहिती नुसार दि. १३/०५/२००९ रोजी मा. आयुक्त यांचे मान्यतेने मा. सर्वसाधारण सभा यांचेकडे राष्ट्रीय फेरीवाला तांत्रिक समिती त्वरित स्थापन करण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तावास ठराव क्र. दि. २०/०५/२००९ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. दि. २०/०६/२००९ चे मा. आयुक्त यांचे टिपणी नुसार जनतेकडून हरकती व शिफारशी मागविल्या असता हरकती व शिफारशी आल्या नसल्यामुळे सुनावणीची प्रक्रिया आवश्यक नाही व आदर्श उपविधीस मनपा ठराव क्र. १७९ दि.११/०२/२०१० रोजी मान्यता देण्यात आली. दि. ०७/०६/२०१४ च्या पत्राने मा. महाराष्ट्र शासन यांनी फेरीवाले धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी व शहर फेरीवाला समिती त्वरित स्थापन करण्यात यावी असे आदेश दिले. त्याप्रमाणे समिती गठीत करण्यात आली. मात्र अद्याप त्या समितीची एकही बैठक झालेली नाही. वास्तविक पाहता या संबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार समितीवर असताना अतिक्रमण विभागाने जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून विक्रेत्यांना त्रास देत आहेत.   यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांनी आपला निर्णय लागेपर्यंत आपली एकजूट कायम ठेवावी, सरकार ऐकत नसेल तर आपणाला आंदोलनाच्या जोरावर आपल्या हक्काची ७० फुट भाजी मंडई मिळविण्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असे संबोधित केले.   यावेळी मंचावर विक्रम कलबुर्गी खाजाभाई करजगी, दाऊद शेख, दत्ता चव्हाण, अकील शेख आदींची उपस्थिती होती. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी, नरेश दुगाने,राजेश काशिद, विजय हरसूरे, जावेद सगरी, बजरंग गायकवाड, मोहन कोक्कुल, युसुफ शेख, हरीश पवार, अमीन शेख, प्रशांत चौगुले, प्रकाश कलबुर्गी सुजित गायकवाड, माजीद नदाफ, आदींनी परिश्रम घेतले.