मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर; तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
.jpeg)
छत्रपती संभाजीनगर, ५ मे : राज्यात उष्णतेचा पारा चाळिशी पार करत असतानाच सोमवारी मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान
घातले. या अनपेक्षित हवामान बदलामुळे तीन शेतकऱ्यांचा विजेच्या धकक्याने मृत्यू झाला असून फळपिकांचे आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. गंगापूर तालुक्यातील अशोक नंदू म्हस्के (२५) हे शेतकरी लिंबाच्या झाडाखाली जनावरे सुरक्षित
करत असताना अचानक विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील वडवणी
तालुक्यातील ढोरवाडी येथील अभिमान नलबे हे शेतात झाडाखाली थांबले असताना संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह विज पडून जागीच
मृत्युमुखी पडले. तिसरी घटना अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी येथील आहे. येथील सचिन मधुकर मगर (३८) यांना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाल्यानंतर
रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
फळपिकांचे व कांद्याचे नुकसान
नाशिकमध्ये शेतात उघड्यावर असलेला कांदा आणि
आंब्याच्या झाडांना अवकाळी पावसाचा फटका बसला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे साडेतीनच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली असून फळपिकांचे नुकसान जालना व बीड
जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याचे वृत्त आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.