तुळजापूर मंदिर परिसराचा कायापालट – 1800 कोटींचा भव्य आराखडा मंजूर

तुळजापूर (धाराशिव), ६ मे : तुळजाभवानी मंदिराचा चेहरामोहरा बदलणार असून, १ हजार ०० कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या विकास योजनेला अखेर गती मिळाली असून, भाविकांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. आमदार पाटील यांनी सांगितले की, “शिखर समितीकडून आराखड्याला मंजुरी मिळाल्याने या ऐतिहासिक प्रकल्पाला आता अधिकृत गती मिळाली आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार असून, जीर्णोद्धाराचे काम सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे.” भाविकांच्या सुविधा केंद्रबिंदू: मंदिर आणि परिसराच्या पुनर्विकासात भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, ज्यांची जागा संपादित होईल, त्यांना योग्य मावेजा दिला जाणार आहे. या कामाचे उद्दिष्ट पुढील ५०० वर्षांसाठी टिकाव धरू शकेल असे बांधकाम करणे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप महायुती सरकारच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला असून, याआधीच्या ठाकरे सरकारच्या काळात या योजनेला चालना मिळाल्याचे दिसून आले नव्हते, अशी टीका आमदार पाटील यांनी अप्रत्यक्षपणे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुळजापूर भेटीदरम्यान आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यांनी तांत्रिक बाबी समजून घेत सूचना केल्या व मंदिराच्या टिकावूपणावर भर देण्याचे निर्देश दिले होते. आजचा दिवस तुळजाभक्तांसाठी ऐतिहासिक ठरणारा असून, विकासाच्या दिशेने मोठा पाऊल टाकण्यात आले आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.