निर्मल जिल्ह्यातील शोकांतिका – एकाच कुटुंबातील पाच जणांचे पाण्यात बळी

नांदेड/निर्मल : तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री सरस्वती देवी
मंदिर, बासर येथे रविवारी (15 जून 2025) एक हृदयद्रावक घटना घडली. हैदराबादच्या
चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18 जण दर्शनासाठी आले
होते. दर्शनाआधी गोदावरी नदीत धार्मिक स्नान करत असताना पाच तरुणांचा पाण्याच्या
खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या तरुणांचे नाव राकेश, विनोद, मदन, रुतिक आणि भरत
असून त्यांचे वय 20 वर्षांखाली होते. सर्व जण मूळचे
राजस्थानचे आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी निर्मल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले
आहेत. इतर 13 सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. IMD
च्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे गोदावरी नदीचा प्रवाह वाढला
होता. नदीत स्नान करताना खोल पाण्यात गेल्याने आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही
दुर्घटना घडली. तेलंगणाचे मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत
नागरिकांनी नद्यांजवळ सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले.
प्रशासनाने पुढील दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याचे आदेश दिले
आहेत. पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनेसारखीच ही घटना एकाच दिवशी घडली असून या
दोन्ही घटनांनी महाराष्ट्र व तेलंगणात हळहळ व्यक्त केली जात आहे.