सोलापूरला मंत्री देण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील – बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका

सोलापूर :  गेल्या दहावर्षापासून मंत्रिपदाने सोलापूरला हुलकावणी दिली आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील. अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.  सत्ताधारी भाजपचे पाच पाच आमदार निडून देणाऱ्या सोलापूरला एकही मंत्रिपद नाही, याबद्दल असलेल्या नाराजीबद्दल छेडले असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलला आहे. सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे तब्बल पाच आमदार निवडून दिले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून भाजपने सोलापूरला एकही मंत्रिपद दिलेले नाही, त्यावरून भाजपच्या वरिष्ठ आमदारांमध्ये नाराजी आहे. मात्र या विषयी जाहीर भाष्य करण्याचे सगळ्यांनीच टाळले आहे.  मात्र  अप्रत्यक्षपणे ती त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. त्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. सोलापूरला मंत्री देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. तो फडणवीस यांचा अधिकार आहे, असे सांगून सोलापूरच्या मंत्रिपदाचा विषय बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात ढकलला. दरम्यान, सोलापूर शहरातील नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड सुरु करण्यासाठी नक्षा स्किम सुरु करत आहोत, अशी घोषणाही बावनकुळे यांनी या वेळी केली. बाजार समितीच्या निवडणुकीपासून नाराज असलेले विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची समजूत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अथवा पक्ष कशा प्रकारे दूर करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. पण, बावनकुळे हे दोन्ही देशमुखांनी नाराजी दूर करतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी थेट सोलापूर भाजपच्या  नेतृत्वाचा विषय येत असल्याने माघार कोण घेणार आणि पडती भूमिका कोण स्वीकारणार, हे पाहावे लागणार आहे. सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका लढवत असताना आम्ही स्थानिक आमदारांना निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत, त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात, त्यामुळे काही लोक नाराजी झाले आहेत. मात्र, त्यांची समजूत काढून नाराजी दूर करण्यात येईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.