ब्रिटिशकालीन कृष्णा नदी पुलाची अवस्था धोकादायक, पर्यायी पूल ठप्प

सातारा :- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पूल कोसळून पर्यटक वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर, राज्यातील जुन्या पुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सातारा-पंढरपूर महामार्गावरील कृष्णा नदीवरील 110 वर्ष जुन्या पुलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पुलाला पर्यायी मार्गाची आवश्यकता असूनही, बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. ब्रिटिशकालीन पूल असलेल्या या मार्गावरून अजूनही नियमित वाहतूक सुरू आहे. या पुलाचे बांधकाम गुळ व चुना याच्या मिश्रणातून झाले असून कालांतराने या पुलाच्या पायाखालच्या चिरा निसटत असल्याचे निदर्शनास आले आहे. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पर्यायी पूल पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, "माहुली येथील पर्यायी पुलासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले असूनही, गेल्या तीन वर्षांत केवळ पिचिंग व एकच पिलर उभा करण्यात आला आहे. या वेगाने काम झाले, तर आणखी पाच वर्षे लागतील.या पुलावरून साताऱ्याच्या पूर्व भागाशी संपर्क साधला जातो. त्यामुळे हा पूल मोडकळीस आल्यास मानवी व आर्थिक नुकसान अतोनात होण्याची शक्यता आहे. चोरगे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करत ठेकेदाराला स्मरणपत्र देऊन कामाला गती द्यावी, तसेच भविष्यकाळात कोणताही अपघात घडू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहावे, अशी मागणी केली आहे.