टेम्पो-कार भीषण धडक: कारतील एअरबॅग उघडल्या, पण जीव वाचला नाही

सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी कारमधून निघालेल्या कुटुंबाला भीषण अपघाताचा सामना करावा लागला. बोरगाव-वेळापूर पालखी मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिजजवळ डीजे घेऊन जात असलेल्या टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील नऊ वर्षीय उत्कर्ष बळीराम व्यवहारे (रा. कुर्डुवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मोठा भाऊ संकल्प (१३) व आई चांदणी व्यवहारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कुटुंबातील बळीराम व्यवहारे हे मूळचे नेवरे (ता. माळशिरस) येथील असून कुर्डुवाडीत खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. 8  जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास नेवरे गावी नातेवाईकाच्या लग्नासाठी निघाले होते. त्यांच्या कारमध्ये पत्नी चांदणी, मुले उत्कर्ष आणि संकल्प तसेच भाचा गणेश सावंत (१६) हे होते. गाडी बोरगावच्या ब्रिजजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगात आलेल्या डीजे टेम्पोने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. धडकेनंतर कारची समोरील बाजू अक्षरशः चक्काचूर झाली. दोन्ही एअर बॅगा उघडल्या, मात्र अपघाताचा जोर इतका होता की डॅशबोर्डवर आदळल्याने उत्कर्षच्या डोक्याला गंभीर आंतरिक दुखापत झाली. कान आणि नाकातून रक्तस्राव सुरू होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात टेम्पो चालक समीर अन्वर शेख (३५, रा. वेळापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार मनोज बागडे करत आहेत.