विजयपूरमध्ये भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
.jpeg)
विजयपूर | दीपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगोळीजवळ राष्ट्रीय महामार्ग ५० वर बुधवारी सकाळी ६.३० वाजता तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत. अपघातात महिंद्रा बलरो कार, खाजगी बस आणि कंटेनर यांचा सहभाग होता. कारने डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या बसला धडक दिली, आणि नंतर बसने कंटेनरला धडक दिली. अपघातात पी. भास्कर (वय ३६), पत्नी पवित्रा (३४), मुलगा अभिराम (१४), मुलगी जोश्ना (१२) हे चौघे आणि कार चालक विकास मुकणी (३०) जागीच ठार झाले. बस चालक बसवराज लमानी (४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बस मुंबईहून बल्लारीकडे जात होती. कारमधील सर्व प्रवासी तेलंगणामधील पी. भास्कर यांच्या कुटुंबातील सदस्य होते. ते मुरुडेश्वर आणि इतर पर्यटनस्थळ पाहून परतत होते. कारमधील १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस अधिकारी हजर होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मनगोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.