शिंदेंकडून नाराज शिलेदारांना श्रद्धा, सबुरीचा सल्ला

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मात्र, मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याकडे महायुतीमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांसोबतच सर्व राज्याचे लक्ष लागले होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तारदेखील झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीमधील अनेक आमदारांचा अपेक्षाभंग केला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपदासाठी दावेदार असलेले मात्र संधी न मिळू शकलेले शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत, यातील काहींनीतर आपली नाराजी उघडपणे बोलूनदेखील दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहन्यांना संधी मिळाली. त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये शिवसेनेचे नेते तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे.

नुकतेच विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी विश्वासाने सांगतो, ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले नाही ते पक्षाचे काम करतील, संघटना वाढवण्यासाठी काम करतील, दुसऱ्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळेल. ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले आहे, ते दुसऱ्या टप्प्यात पक्षासाठी काम करतील. मंत्रिपदासाठी श्रद्धा, सबुरी ठेवावी लागते. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली त्यांना पक्ष संघटनेत स्थान मिळेल. आता जबाबदारी वाढली आहे. शिवसेना एक कुटुंब आहे, त्यामुळे कोणी कुठेही जाणार नाही. पद येतात जातात, पदापेक्षा आमचे उत्तरदात्वीय हे लोकांशी जी नाळ जोडली आहे, त्याच्याशी आहे. अडीच वर्षात आम्ही तेच केले प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले, असे शिंदे यांनी म्हटले आहे.