शेहबाज शरीफ यांची पलटी: भारताशी शांतता चर्चेची तयारी दाखवली

इस्लामाबाद/तेहरानपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपली भूमिका सौम्य केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराण दौऱ्यात भारताशी शांतता चर्चा करण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. शरीफ सध्या तुर्की, इराण, अझरबैजान आणि ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर असून, तेहरान येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काश्मीर, पाणी वाटप, दहशतवाद आणि व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले. शरीफ म्हणाले, आम्हाला सर्व वाद वाटाघाटीद्वारे सोडवायचे आहेत.” मात्र, यापार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा आपली सपष्ट भूमिका मांडली आहे की, पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर (POK) परत मिळवण्यापुरती आणि दहशतवादाच्या मुद्द्यापुरतीच मर्यादित असेल. भारताने म्हटले, "काश्मीरवर आमची भूमिका स्पष्ट आहे. आता एकच मुद्दा शिल्लक आहे – POK परत मिळवणे." शरीफ यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, "चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तान जिंकला होता," आणि भारताने आक्रमक पवित्रा घेतला तर "प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे आम्हाला माहिती आहे," असे देखील ते म्हणाले.

तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नको – भारताचा पुनरुच्चार

पूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. यावर भारताने ठाम भूमिका घेत "भारत-पाकिस्तानमधील कोणतीही चर्चा द्विपक्षीय असली पाहिजे, तिसऱ्या पक्षाचा सहभाग नको," असे स्पष्ट केले होते. हीच भूमिका भारताने पुन्हा अधोरेखित केली आहे.