संस्कारयुक्त शिक्षण मिळते ते शांतिकुटीरच्या उन्हाळी शिबिरामध्येच

विजयपूर :-आम्ही देखील उन्हाळी शिबिरं आयोजित करतो, परंतु त्यामध्ये आम्ही मुलांना पाठ्यपुस्तकातील विषय शिकवतो. मात्र शांतिकुटीरमध्ये होणारे शिबिर हे केवळ पाठ्यशिक्षणापुरते मर्यादित नसून, ते मुलांना जीवनाचे धडेही शिकवते. येथे शिक्षण घेणारी मुले खरोखरच भाग्यवान आहेत."येथील एक्सलंट ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष बसवराज कवलगी यांनी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले स्वामी विवेकानंदांच्या मते, शिक्षण म्हणजे मुलामधील सुप्त गुण ओळखून त्यांना विकसित करणे, मुलाचा सर्वांगीण विकास करणे, अध्यात्माच्या पाया वर शिक्षण उभारणे. ही सर्व तत्त्वे या शिबिरात अंमलात आणली जात आहेत, असे त्यांनी सांगितले आजच्या मुलांमध्ये शिक्षणासोबत अध्यात्म व संस्कार रुजवणे आवश्यक आहे. केवळ पुस्तकी ज्ञान दिल्यास मुले मोबाईल, टीव्ही अशा अनेक वाईट सवयींमध्ये अडकतात. त्यांच्यामध्ये पालक व गुरुजनांप्रती आदर नसतो याचे कारण म्हणजे संस्कारविहीन शिक्षण, असे जमखंडी येथील ओलेमठाचे परमपूज्य आनंददेव स्वामींनी सांगितले विजयपूर तालुक्यातील कन्नूर येथील शांतिकुटीर आश्रमात आयोजित केलेल्या मोफत शैक्षणिक व आध्यात्मिक उन्हाळी शिबिराच्या समारोप समारंभात ते दिव्य सान्निध्य देताना बोलत होते. त्यांनी सांगितले की, शांतिकुटीरमध्ये होणारे हे मोफत शिबिर, मुलांना शिक्षणासह आवश्यक ते अध्यात्म व संस्कारही देते. वाईट सवयींपासून दूर राहण्यासाठी संस्कारित शिक्षणच उपाय आहे. कोल्हापूर येथील प्रा. डॉ. जी.पी. माळी यांनी बोलताना सांगितले की, धार्मिक क्षेत्रात अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम खूपच दुर्मीळ आहेत. २१वे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. त्यामुळे घरी मोठा टीव्ही न ठेवता मोठी कपाटे ठेवावीत आणि त्यात चांगली धार्मिक, नैतिक वाचनीय पुस्तके ठेवावीत, असे त्यांनी सुचवले. येथे मुले पाठ्य आणि पाठ्येतर क्रियाकलाप शिकली असून, ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी ठरतील, असे ते म्हणाले. श्री शैलेश्वर विद्याकेन्द्राचे प्रशासक कुमार एस. नानावटे यांनी प्रस्ताविक भाषणात सांगितले की, सद्गुरु समर्थ गणपतराव महाराजांच्या संकल्पाप्रमाणे आणि संस्थापक दिवंगत एस. व्ही. नानावटे यांच्या इच्छेप्रमाणे, गेली २३ वर्षे कन्नूर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी हे मोफत शैक्षणिक व आध्यात्मिक शिबिर आयोजित केले जाते. प्रत्येक विद्यार्थी हा नीतीवान, गुणवान, आरोग्यवान आणि बुद्धिवान बनावा, हा आमचा उद्देश आहे. एक महिन्याच्या शिबिरात विद्यार्थ्यांना पाठ्यविषयांसह अॅबॅकस, योग, प्रिंट हँड रायटिंग, कराटे, स्पोकन इंग्लिश, चित्रकला इत्यादी शिकवण्यात आले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य वाटण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तके देण्यात आली. मुलांच्या सातत्यपूर्ण शिक्षणासाठी पालकसभा आयोजित करण्यात आली होती. समारंभात शांतिकुटीर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदलाल बहेती यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी गुरु परंपरेतील ज्येष्ठ अजीत द. कन्नूर, श्री शैलेश्वर विद्याकेन्द्र सांडूरच्या अध्यक्ष लक्ष्मीबाई एस. नानावटे, रामराज्य कलामेळाचे अध्यक्ष, शांतिकुटीरचे श्रीकृष्ण संपगावकर, भारतीय सुराज्य संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, गुरुबंधू, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपली मते व्यक्त केली. विद्यार्थिनींनी काव्या आणि स्नेहा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका रूप सी. आर. यांनी स्वागत केले. श्रीकृष्ण संपगावकर यांनी आभार मानले. या शिबिराच्या आयोजनास मदत केलेल्या दानशूर व्यक्तींना व संस्था चाणक्य करिअर अकॅडमी, अगस्त्य फाउंडेशन, एक्सलंट एज्युकेशन ग्रुप, रोटरी क्लब बागलकोट, वेद अकॅडमी, प्रिझ्म बुक्स (बंगळुरू), इन्स्पायरिंग माइंड्स (पुणे), विन एज्युकेशनल मेंटर्स (पुणे), अध्यात्म भांडार, रामराज्य कलामेळ इत्यादींना कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेवटी, विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, बक्षिसे आणि शिक्षण साहित्य देऊन गौरवण्यात आले.