शनैश्वर देवस्थानचा निर्णय भाविकांसाठी डोकेदुखी ठरतोय; स्वच्छतेच्या कारणावरून दर्शन बंद

सोनई (ता. नेवासा) :- शनैश्वर देवस्थान
ट्रस्टने ११ जूनपासून रात्री १०.३० ते पहाटे ४ पर्यंत दर्शन बंद करण्याचा निर्णय
घेतला आहे. स्वच्छता आणि सुरक्षेचे कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आला असला तरी,
यामुळे भाविकांना मुक्कामी थांबण्याची गरज भासत आहे. गावात उत्तम
दर्जाच्या खोल्यांची कमतरता असून, देवस्थानच्या तीन
भक्तनिवासांमध्ये अनेक खोल्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे भाविक अहिल्यानगर,
शिर्डी, छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणी
मुक्काम करताना दिसत आहेत.
शुक्रवारी (ता. १४) सर्व खासगी लॉज
फुल्ल झाल्याची माहिती आहे. देवस्थानच्या खोल्या रिकाम्या असतानाही भाविक मुक्काम
टाळत आहेत, कारण येथे सरकते
दरवाजे बसवले गेले असले तरी, कडी-कुलपांची सोय नाही, त्यामुळे सुरक्षेच्या भीतीने अनेक जण मुक्कामास नकार देतात. गावात आर्थिक
उलाढाल मात्र वाढली दर्शन बंद झाल्याने भाविक मुक्काम करत असून, जेवण, नाश्ता, चहा आणि इतर
सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, गावातील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. विशेषतः उच्चभ्रू
भाविकांकडून चांगल्या खोल्यांना मागणी असून, अशा खोल्या
गावात अत्यल्प असल्याने त्यांचाही नाराजीचा सूर आहे. ग्रामस्थांची आरोप-टिका ग्रामस्थांमध्ये
चर्चा आहे की, देवस्थानच्या काही पदाधिकाऱ्यांचे स्वतःचे
खासगी लॉज असल्याने, देवस्थानच्या भक्तनिवासांकडे मुद्दाम
दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भाविकांना योग्य सुविधा मिळत नाहीत. समस्या व
धोका काळात वाढणार श्रावण महिना, शनिप्रदोष, शनिजयंती, नाताळ, दिवाळी किंवा
सलग सुट्ट्यांच्या कालावधीत, जेव्हा भाविकांची गर्दी वाढते,
त्यावेळी ही सुविधा अपुरी पडण्याचा धोका आहे. सध्याची परिस्थिती
पाहता, ट्रस्टने भक्तनिवास सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे
गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.