ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन; ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्रण करणारा लेखक हरपला

संभाजीनगर:  ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी  चित्रण  करणारे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार विशेषतः ग्रामीण लेखक म्हणून ओळख असणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे आज निधन झाले. 84 वर्षांचे होते. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जात. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा' या कादंबरीवरून त्यांना 'पाचोळा'कार बोराडे हे नामाभिधान मिळाले होते. या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत. अनेक विद्यापीठात बोराडे यांची पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत. व्यापक वाचक असलेल्या निवडक लेखक साहित्यिकांमध्ये बोराडे यांचे नाव अग्रक्रमावर आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बोराडे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सरकारी गोदामात सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करवली. खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. नुकताच महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 'मराठवाडा साहित्य परिषदे'ला जाहीर करण्यात आला होता. 1963 साली रा.रं. बोराडे हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1971 पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. ते श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथेही प्राचार्य राहिलेले आहेत. 2000 साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. रा. रं. बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला होता. त्या काळी काटगाव हे अत्यंत मागासलेले खेडे होते. तेथे शाळाही नव्हती. खासगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जाई. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खासगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पदवी पूर्ण