शाळा सुरू, पण तृतीय भाषेची पुस्तके नाहीत!

पुणे – राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आठवडा उलटूनही, तिसऱ्या भाषेच्या म्हणजेच हिंदी विषयाच्या पुस्तकांची छपाई अद्याप झाली नाही. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती यांना अद्याप यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत. आदेश मिळाल्यानंतरच छपाई सुरू होणार असल्याची माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांनी सर्व माध्यमांच्या – इंग्रजी, मराठी व इतर – शाळांसाठी पहिली व दुसरीसाठी विषयवार वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, आठवड्यातून पाच दिवस तिसरी भाषा शिकविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची असेल.

मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा:
हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. "हिंदी पुस्तके छापण्याचा प्रयत्न झाला, तर तो थांबवू. पुस्तके छापलीच तर ती वाटू दिली जाणार नाही," असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या अध्यापनावर अनिश्चिततेचे सावट आहे.

शिक्षकांपुढील प्रश्न:
पुस्तकांविना तिसरी भाषा शिकवायची कशी? असा प्रश्न आता शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. शासनाच्या निर्देशांनुसार तासिका घ्यायच्या असल्या, तरी शिकवण्यासाठी आवश्यक असलेली साधने – म्हणजेच पुस्तके – उपलब्ध नसल्याने शैक्षणिक अडचणी वाढल्या आहेत.

बालभारतीचे स्पष्टीकरण:

बालभारतीला हिंदी विषयाच्या पुस्तक छपाईचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. छपाईसाठी आदेश मिळाल्यानंतरच पुस्तक छपाई सुरू करण्यात येईल. नेमकी पुस्तकांच्या मागणीची संख्याही लागणार असून, त्यानुसारच पुस्तक छपाई केली जाईल.”
कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती