मतदार यादीतील घोळांवरून राज ठाकरे संतप्त — “आयोग सत्ताधाऱ्यांसाठी काम करत नाही, निवडणुका थांबवा!”
मुंबई | १५ ऑक्टोबर: महाराष्ट्रातील
मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित गोंधळावरून आज मुंबईत मोठी खळबळ उडाली. मनसे
प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी (MVA) नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांची भेट घेऊन
मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप घेतला. राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही
सत्तेतील तीन पक्षांसाठी काम करत नाही. मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर सर्वोच्च
न्यायालयाला सांगा की आम्ही निवडणुका घेऊ शकत नाही. मतदार याद्या आम्हाला द्या,
आम्ही शहानिशा करू.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला — “बाळासाहेब थोरात आठ टर्म ८०-९० हजार मतांनी जिंकतात, पण यंदा लाखाने पडले — हे कसे शक्य आहे?”
उद्धव
ठाकरे यांचा सवाल – “आम्ही नेमकं कुणाशी बोलायचं?”
या भेटीत शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही
निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत हल्ला केला.
“मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य आयोग
म्हणतात ही आमची जबाबदारी नाही, मग आम्ही कोणाशी बोलायचं?
व्हीव्हीपॅट तपासणी तुम्ही घेत नाही, म्हणजे
पुरावे तुम्ही नष्ट कराल!”
उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला —
“निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही.
सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा. मतदार याद्यांमध्येच घोळ असेल तर थेट ‘इलेक्शन फॉर सिलेक्शन’ करून टाका!”
जयंत
पाटील यांची नाराजी:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील
म्हणाले,
“आम्ही अर्ज केला, पुरावे
दिले, पण निवडणूक आयोग उत्तर देत नाही.”
त्यांनी सांगितले की, “उदगीरमधील अंतेश्वर गंगाराम शिंदे
नावाचा मतदार सकाळी यादीत असतो आणि संध्याकाळी डिलीट होतो. हा कसा प्रकार?”
त्यावर आयोगाच्या अधिकार्यांनी उत्तर दिले की, “आम्ही तपास करत आहोत.”
इतर
नेत्यांचे आरोप:
- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी): एका पक्षाला अनुकूल
अशी वॉर्ड रचना केली गेली आहे.
- अनिल परब (शिवसेना ठा. गट): मतदार
याद्यांमध्ये काही नावे मल्याळम भाषेत लिहिलेली आहेत.
- विजय वडेट्टीवार (काँग्रेस):
“देवांग दवे कोण आहे, याची चौकशी करा. हा भाजपचा माणूस आहे आणि तोच निवडणूक आयोगाच्या मीडियाशी
संबंधित काम पाहतो.”
त्यांनी आरोप केला की, “मतदार यादीत एवढा घोळ
असेल तर निवडणुका पारदर्शक कशा होतील?”