विखे-थोरातांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार

विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय खेळी यशस्वी झाली अन् काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा हादरा बसला. मंत्री विखे यांनी अमोल खताळ यांच्या आमदारकीच्या रुपाने संगमनेरमध्ये विधानसभेत यश मिळवले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संगमनेरमध्ये यश मिळवण्याची तयारी मंत्री विखेंनी आमदार खताळ यांच्या माध्यमातून सुरू केली असून, तशा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

विखे यांनी जलसंपदा मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते श्रीक्षेत्र निझर्णेश्वर इथं येत दर्शन घेतले. यावेळी विखे समर्थक उपस्थित होते. आमदार अमोल खताळ, बापूसाहेब गुळवे, राष्ट्रवादीचे आबासाहेब थोरात, कैलास तांबे, मच्छिंद्र शेटे उपस्थित होते. मंत्री विखे यांनी संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाचे कौतुक करताना पुढचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याचे सूतोवाच केले. आमदार खताळ यांच्या विजयाने संगमनेर तालुक्यात परिवर्तन होऊ शकते, हा विश्वास सर्वांना मिळाल्याने भविष्यात अशाच संघटितपणे आपल्याला संगमनेर तालुक्यात यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने तयारीला लागा अशा सूचना केल्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विखे आणि थोरात यांचा संघर्ष पाहायला मिळू शकतो. मंत्री विखे स्थानिकच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेरमध्ये लक्ष घालणार, हे पुन्हा निश्चित झालं आहे. आमदार खताळ यांनी देखील तालुक्यात विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, असे सांगून तयारी करणार असल्याचे संकेत दिले