प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण – मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील प्रार्थनास्थळांवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांची परवानगी, त्याच्या आवाजाची मर्यादा आणि नियमांचे पालन यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंग्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भोंग्यांसंदर्भात नियमावली असली तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे आगामी काळात कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या
विधानातील महत्त्वाचे मुद्दे:
- पोलिस
निरीक्षकांना भोंग्यांच्या परवानग्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले जातील.
- परवानगी
नसलेल्या किंवा ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या भोंग्यांवर कारवाई केली जाईल.
- कायद्याने
ठरवलेली ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलपेक्षा जास्त असल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ
कारवाई करेल.
- नियमांचे
उल्लंघन झाल्यास संबंधित प्रार्थनास्थळी पुन्हा परवानगी दिली जाणार नाही.
शिवसेनेवर टीका:
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट)
खासदार संजय राऊत यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करताना, "धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद करू, पण दररोज सकाळी
वाजणाऱ्या ९ च्या भोंग्याचे काय?" असा खोचक सवाल केला.