पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानने 7-8 मे च्या रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब आणि गुजरातमधील 15 भारतीय शहरांवरील सैन्य तळांना ड्रोन आणि मिसाइल्सद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या अत्याधुनिक S-400 हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व हल्ले हवेतच नष्ट करत पाकिस्तानचा डाव उधळला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने लाहौरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली, ज्यामुळे त्यांचे रडार निकामी झाले. लाहौरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा प्रामुख्याने चीनी बनावटीची HQ-9/P आणि LY-80 (HQ-16) सॅम सिस्टीम्सवर आधारित आहे. HQ-9/P ची रेंज 125 किमी आहे, तर LY-80 ची 40-70 किमी आहे. ही यंत्रणा विमाने, ड्रोन आणि क्रूझ मिसाइल्स रोखण्यासाठी वापरली जाते. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, बठिंडा, चंदीगड, नल, फलौदी, उत्तरलाई आणि भुज या शहरांमधील सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सेनेच्या एकात्मिक काउंटर UAS ग्रिड आणि S-400 यंत्रणेने या हल्ल्यांना यशस्वीपणे परतवून लावले. अमृतसर जिल्ह्यातील जेठुवाल गावात मिसाइल्सचे अवशेष सापडले, ज्याची तपासणी लष्कराकडून सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर: दहशतवाद्यांचा खात्मा 6-7 मे च्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 9 तळांवर अचूक हल्ले केले. यामध्ये बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह, मुरीदके येथील मरकज तैयबा, सियालकोटमधील महमूना जोया फॅसिलिटी, भिम्बरमधील मरकज अहले हदीस, कोटलीतील मरकज अब्बास आणि मुजफ्फराबादमधील शावई नाला कॅम्प यांचा समावेश आहे. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, तर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरच्या 10 नातेवाइकांचा मृत्यू झाला.