पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याने सिंधू पाणी करारावर भारताला दिली धमकी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तान उत्तरादाखल त्यांच्यावर हल्ला करेल.” आसिफ पुढे म्हणाले, “फक्त गोळ्यांद्वारेच नव्हे, तर पाण्याचा अडवले जाणे हे देखील आक्रमकतेचे रूप आहे.” त्यांनी भारतावर पाण्याचा वापर 'हथियार' म्हणून करत असल्याचा आरोप केला. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेला सिंधू पाणी करार (IWT) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार भारताला रावी, बियास व सतलज नद्यांवर अधिकार, तर पाकिस्तानला सिंधू, झेलम व चिनाब नद्यांवर नियंत्रण देण्यात आले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने कडक भूमिका घेत पाकिस्तानविरुद्ध अनेक कारवाया केल्या – पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, वाघा-अटारी सीमा बंद करणे आणि सिंधू पाणी करार रद्द करण्याची शक्यता व्यक्त करणे यात समाविष्ट आहे. ख्वाजा आसिफ यांनी याआधीही असे विधान केले होते की, “भारत पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. युद्धाची वेळ आली तर पाकिस्तानही उत्तर देईल. मात्र युद्ध हे आमचे अंतिम उद्दिष्ट नाही.”