ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी विरोधकांचा केंद्र सरकारला पत्र

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ या गंभीर घडामोडींसंदर्भात संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या मागणीचे अधिकृत पत्र केंद्र सरकारकडे सादर केले जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राऊत म्हणाले की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पत्र केंद्र सरकारकडे सादर करू. पहलगाम हल्ला हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इशारा आहे. त्यामुळे संसदेत यावर सविस्तर चर्चा व्हावी.” पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर थेट हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा समोर आला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांवर कारवाई केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता, मात्र पुढे दोन्ही देशांनी संघर्ष टाळत परस्पर संमतीने शांतीचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, या समझोत्याचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्याचे समोर आले आहे. यावरूनही विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याचा आग्रह कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही.