हरिहर गडावर पर्यटकांची संख्या आता मर्यादित; दिवसाला केवळ 300 जणांना प्रवेश

नाशिक  :- नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय हरिहर किल्ला यावर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात भरभरून पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र या गर्दीमुळे अपघात, गोंधळ आणि उपद्रवकारक वर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे वन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आता पुढे प्रत्येक दिवशी केवळ ३०० पर्यटकांनाच गडावर प्रवेश दिला जाईल. तसेच दुपारी २ नंतर गडावर जाण्यास बंदी असेल आणि दुपारी ४ नंतर कोणीही गडावर थांबता येणार नाही, असा आदेश देण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यातच नियमांना चांगला प्रतिसाद नाशिकचे वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी सांगितले की, “शनिवार-रविवार वन विभागाने प्रत्यक्ष प्रयोग राबवून गर्दी नियंत्रणात आणली. पर्यटकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे.”

मद्यपान व गैरवर्तनास बंदी वन विभागाने हरिहर गडासोबत ब्रह्मगिरी, अंजनेरी, दुगारवाडी धबधबा व नेकलेस फॉल (पहिने) या ठिकाणांनाही मद्यपान निषिद्ध क्षेत्रे घोषित केले आहे. मद्यपान करणाऱ्यांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश नाकारण्यात येईल, तसेच गाइड किंवा सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. पूर्वनोंदणी आवश्यक – मोठ्या गटांसाठी सक्ती अधिक पर्यटक आल्यास नियंत्रण कठीण होते. त्यामुळे मोठ्या गटांनी किल्ल्यावर येण्यापूर्वी किमान ७२ तास आधी 9420352395 या क्रमांकावर संपर्क करून पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही देवकर यांनी स्पष्ट केले. हरिहर किल्ला – महाराष्ट्रातील पहिला ‘कॅरिंग कपॅसिटी’ निश्चित किल्ला कॅरिंग कपॅसिटी’ म्हणजे एखाद्या पर्यटन स्थळावर पर्यावरणीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने किती पर्यटकांचा ताण सहन होऊ शकतो हे निश्चित करणे. हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील पहिला असा किल्ला ठरला आहे, जिथे ही मर्यादा अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे.