अमरावतीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; आत्महत्येची टोकाची वाट

अमरावती : राज्यात एकामागोमाग एक समोर येत असलेल्या हुंडाबळीच्या घटनांमध्ये आता अमरावतीचाही समावेश झाला आहे. वरुड तालुक्यातील आमनेर गावात एका विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पती, दीर आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. २०२२ मध्ये झाले होते लग्न, काही महिन्यांतच छळास सुरुवात मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह २०२२ मध्ये अब्दुल फईम अब्दुल रहीम या युवकासोबत झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना, काही महिन्यांनी आंधण’ कमी दिल्याच्या कारणाने तिच्यावर छळ सुरू झाला. पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करायला सुरुवात केली होती. छळाला कंटाळून गळफास या छळाला कंटाळून पीडित विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पीडितेचे वडील अकबर खान यांनी वरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पती अब्दुल फईम, दीर अब्दुल नदिम आणि एक महिला नातेवाईक यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची तत्पर कारवाई : तिघांना अटक पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर राज्यात पुणे, नाशिक आणि आता अमरावतीअशा ठिकाणी हुंड्याच्या कारणाने होणाऱ्या आत्महत्या गंभीर सामाजिक समस्या बनल्या आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.