मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या

मुंबई : मराठी चित्रपट-मालिका-नाटक यातून विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगांवकर याने आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मानसिक तणावातून तुषारने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. तुषारच्या निधनाने त्याच्या कुटुंबासह मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, भाऊबळी, उनाड, झोंबिवली, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, संगीत बिबट आख्यान यासारख्या अनेक कलाकृतींमधूनन तुषार घाडीगांवकर याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. नुकतंच सन मराठी वाहिनीवरील सखा माझा पांडुरंग मालिकेतही तो झळकला होता. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील तुषारने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्य विभागात सक्रिय होता. मित्रांमध्या 'घाड्या' म्हणून तो ओळखला जात होता. कॉलेजनंतर मालिका, चित्रपट असा प्रवास सुरु असतानाच त्याने अचानक टोकाचा निर्णय घेतल्यामुळे मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकुर वाढवे यानेही तुषारच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात! आपण मार्ग काढला पाहिजे, पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार, तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो" अशा शब्दात अंकुरने फेसबुकवरुन भावना व्यक्त केल्या आहेत.