मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई

जालना: जालन्यात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कारवाई करण्यास
सुरुवात केली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यात
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया
आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात
जालन्यातील अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या
हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या
आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्या
प्रकरणी जालना गुन्हे दाखल आहेत. गोदी पोखरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली
आहे. काही आरोपींविरोधात 2019 पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत.
आणखी काही प्रस्ताव प्रशासनाने तयार केले आहे. नऊ जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या
नऊ जणांपैकी सहा आरोपी हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील आंदोलक असल्याची
माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे त्यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही यामध्ये
समावेश आहे. जालना, बीड, परभणी या
जिल्ह्यातून त्याला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. विलास खेडकर
याच्याविरोधात २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा
दाखल आहे. २०२३ मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी ३०७, ३५३ आणि ४३५ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२३ मध्ये
गोदावरी नदीतून ४ लाख ८१ हजार रुपयांची १०० ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.