रेल्वे नोकरीच्या बदल्यात जमीन! लालू यादवांवर CBIचा थेट आरोप

पाटणा/नवी दिल्ली : बिहारच्या गाजलेल्या 'Land for Jobs' घोटाळ्यात तपास करणाऱ्या सीबीआयने मोठे खुलासे करत राऊस अव्हेन्यू कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात असा दावा करण्यात आला आहे की, तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्या कुटुंबाला जमीन हस्तांतरित करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ नोकरी देण्याचे आदेश दिले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्रुप-डी पदांवरील नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांच्या बदल्यात लालू यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी जमीन व कवडीमोल दरात संपत्ती मिळवली. या घोटाळ्यात सीबीआयने १०२ जणांना आरोपी म्हणून नाव दिले आहे. तपासात असे समोर आले आहे की, लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी सुमारे ४.३९ कोटी रुपयांच्या सर्कल रेटच्या तुलनेत १ लाख चौरस फुटांहून अधिक जमीन केवळ २६ लाख रुपयांत खरेदी केली होती. सीबीआयचे म्हणणे आहे की, नोकरी मिळवणाऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत. विशेष सरकारी वकील डी. पी. सिंह यांनी कोर्टात सांगितले की, "एका वेळी इतक्या अर्जांवर इतक्या लवकर निर्णय घेणे शक्य नाही. कोणतीही औचित्य सांगितली न जाता नोकऱ्या दिल्या गेल्या." या घोटाळ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.