लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया न केल्यास हप्ता थांबणार

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेसाठी आता ई-केवायसी (E-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास पुढील महिन्याचा हप्ता मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून ई-केवायसीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देऊन अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी ई-केवायसीची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर होती, जी वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली होती. ४५०० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता ऑक्टोबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता ३ व ४ नोव्हेंबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला होता. मात्र, त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. शासनाच्या संभाव्य निर्णयानुसार, जानेवारी २०२६ पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून सुमारे ४५०० रुपये एकत्र खात्यात जमा होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ई-केवायसी कशी कराल?

  • ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा
  • ई-केवायसीपर्याय निवडा
  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी आणि आधार क्रमांक भरा
  • आवश्यक वैयक्तिक माहिती भरा
  • वडील किंवा पती जिवंत असल्यास त्यांचा आधार क्रमांक नमूद करा
  • जात निवडा आणि कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे का याची माहिती द्या
  • बायोमेट्रिक प्रक्रियेद्वारे ई-केवायसी पूर्ण करा