भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्याला आता २४ तासांहून
कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. दोन्ही देशांतील चाहते रविवारीची आतुरतेने वाट
पाहत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान महामुकाबला
होणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांना पहिल्या सामन्यात
न्यूझीलंडकडून मार खावा लागला आहे. त्यात आयसीसीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा
उगारला आहे आणि भारताविरुद्धच्या सामन्यात चूक झाल्यास कर्णधार मोहम्मद रिझवानवर
बंदीची कारवाई होऊ शकते. पाकिस्तानला
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने सहज पराभूत केले. ३२० धावांचा पाठलाग करताना
पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६० धावांत तंबूत पाठवून न्यूझीलंडने ६० धावांनी विजय
मिळवला. त्यात सामन्याच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर फखर झमान क्षेत्ररक्षण करताना
दुखापतग्रस्त झाला. त्याने कशीबशी फलंदाजी केली, परंतु
त्याला स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या
आहेत. त्यात आयसीसीने पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंवर कारवाई केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या
सामन्यात निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे आयसीसीने पाकिस्तानच्या सर्व
खेळाडूंना दंड सुनावला आहे. त्यांना त्यांच्या मॅच फीमधील पाच टक्के रक्कम दंड
म्हणून भरावी लागणार आहे. पंच रिचर्ड केटलबर्घ आणइ सरफुदौला यांच्यासह तिसरे पंच
जोएल विल्सन व चौथे पंच अलेक्स वार्फ यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा
कर्णधार मोहम्मद रिझवान याने चूक मान्य केली आहे. आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट
स्टाफसाठीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार, किमान षटकगतीच्या उल्लंघनासंदर्भात, जर संघ ठरलेल्या
वेळेत षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला, तर प्रत्येक षटकासाठी
खेळाडूंवर त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो. १९९६ नंतर प्रथमच
आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानला ग्रुप ए च्या सलामी सामन्यात
न्यूझीलंडने सहज पराभूत केले. रिझवान आणि त्याचा संघ आता रविवारी दुबईत होणाऱ्या
भारताविरुद्धच्या (IND vs PAK) महत्त्वाच्या सामन्यात विजय
मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.