सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा आयईडी हल्ला; एएसपी आकाश राव गिरीपुंजे शहीद

सुकमा (छत्तीसगड) : छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला उत्तर देताना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसक मार्ग स्वीकारत आयईडी स्फोट घडवून आणला आहे. सुकमा जिल्ह्यात दोंड्रा गावाजवळ सोमवारी सकाळी ९ वाजता झालेल्या या स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) आकाश राव गिरीपुंजे शहीद झाले आहेत, तर अनेक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गस्त घालण्यादरम्यान आयईडी स्फोट सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सीपीआय (एम) च्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर एएसपी गिरीपुंजे आपल्या पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. जखमींना तातडीने कोंटा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान एएसपी गिरीपुंजे यांना वाचवता आले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक घटनेनंतर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शामरा यांनी शोक व्यक्त करत म्हटले, "आकाश राव गिरीपुंजे हे एक शूर अधिकारी होते. त्यांना अनेक शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. हा आमच्यासाठी दुःखद आणि अभिमानास्पद क्षण आहे." राज्य शासनाने या घटनेच्या पूर्ण तपासाची आणि नक्षलविरोधी कारवाईची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे. मागील घटनांची पुनरावृत्ती याआधीही ६ जानेवारी २०२५ रोजी विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ८ सुरक्षा जवान आणि १ नागरिकाला आयईडी स्फोटात मारले होते. तेव्हाही हा हल्ला सुमारे ६०-७० किलोच्या स्फोटकाने करण्यात आला होता. नक्षलवाद्यांची निराशा हिंसाचारातून स्पष्ट सततच्या सुरक्षा मोहिमांमुळे नक्षलवाद्यांमध्ये असलेली हतबलता आता त्यांच्या हिंसक कृतीतून दिसून येत आहे. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवण्याचा शासनाचा निर्धार आहे. मात्र नक्षलवाद्यांकडून पेरण्यात येणारे आयईडी आता सुरक्षा दलांसाठी मोठं आव्हान बनले आहेत.