ICC चे नवे नियम जाहीर – क्रिकेटमध्ये मोठे बदल, गोलंदाजांना मिळणार दिलासा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आगामी काळात क्रिकेट अधिक रोमांचक
बनवण्यासाठी काही मोठ्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. हे बदल
एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी तिन्ही
प्रकारांमध्ये करण्यात आले असून, यांचा अंमल 2 जुलैपासून श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेपासून होईल.
वनडे क्रिकेटमध्ये दोन चेंडूंच्या
नियमात बदल –
गेल्या काही वर्षांत वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढले
असून, यामध्ये बदल करण्यासाठी ICC ने
नवा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही टोकांवर दोन नवीन चेंडूंचा वापर केला जात
होता, पण यामुळे रिव्हर्स स्विंग मिळवणे कठीण झाले होते.
नवीन नियमांनुसार, सामन्याच्या पहिल्या 34
षटकांसाठी दोन चेंडू वापरण्यात येतील, पण 35व्या षटकानंतर फक्त एकाच चेंडूचा वापर केला जाईल. या निर्णयामुळे शेवटच्या
षटकांमध्ये गोलंदाजांना अधिक मदत होईल.
सीमारेषेवरील झेल आणि डीआरएसमध्ये
बदल –
फिल्डिंगच्या प्रगतीमुळे सीमारेषेवरील कॅच्समध्ये अचंबित करणारे
निर्णय पाहायला मिळतात. मात्र, त्यासंदर्भात अनेक वेळा वाद
निर्माण होतात. त्यामुळे आयसीसीने या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) संदर्भातही काही सुधारणा करण्यात येणार
आहेत. त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
कन्कशन सब्स्टिट्यूटसाठी आता पाच
पर्याय –
कन्कशन सब्स्टिट्यूट नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता
सामन्याआधी प्रत्येक संघाने पाच पर्यायी खेळाडूंची नावे देणे बंधनकारक करण्यात आले
आहे.
यामध्ये यष्टीरक्षक, फिरकी गोलंदाज, वेगवान गोलंदाज, अष्टपैलू आणि फलंदाज यांचा समावेश
असावा लागेल.
जर एखादा खेळाडू कन्कशनमुळे बाहेर गेला, तर
त्याच्या जागी त्याच प्रकाराचा खेळाडू मैदानात उतरवता येईल.
हा नियम कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 नंतर लागू केला जाईल. मात्र, श्रीलंका-बांगलादेश
कसोटी मालिकेत 17 जूनपासून याचा वापर होणार आहे.