सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान घातले. पापरी गावातील शेतकरी दत्ता कदम यांच्या दीड एकरातील केळी बाग वाऱ्यामुळे उध्वस्त झाली आहे.

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः पापरी परिसरात वादळाचा मोठा फटका बसला असून अनेक शेतजमिनींवर उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. पापरी गावातील शेतकरी दत्ता कदम यांची दीड एकर क्षेत्रातील केळी बाग वादळामुळे पूर्णपणे उध्वस्त झाली असून, त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. वादळामुळे केळीच्या झाडांचे पुन्हा उत्पादन घेणे अशक्य झाले असून, कर्जबाजारीपणाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक भार वाढला आहे. दत्ता कदम यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. "सरकारने लवकरात लवकर मदत केली नाही, तर उदरनिर्वाह करणे कठीण होईल," असे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांनीही प्रशासनाकडे लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.