राज्यात अतिवृष्टीचा कहर; ५ दिवसांत २१ मृत्यू, १२ जखमी

मुंबई राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मोठा विध्वंस घडवला असून आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले आहेत. पाण्यात बुडून, वीज कोसळून, झाड किंवा भिंत कोसळून ही मृत्यूमुखी पडलेले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय २२ प्राण्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय मृत्यूंची नोंद:

  • पुणे३ मृत्यू (झाड, भिंत पडणे आणि वीज कोसळणे)
  • जालना२ मृत्यू (पाण्यात बुडून)
  • अहिल्यानगर२ मृत्यू (भिंत कोसळून)
  • मुंबई शहर/उपनगरप्रत्येकी १ (झाड पडून)
  • नांदेड३ (पाण्यात बुडून)
  • नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारावीज कोसळून एक किंवा अधिक मृत्यू
  • बीड, यवतमाळपाण्यात बुडून प्रत्येकी १ मृत्यू
  • गोंदिया, रायगडमृत्यूचे कारण अस्पष्ट

पिकांचं मोठं नुकसान – शेतकरी हवालदिल

वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यातील ४० हजार ९४९ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामातील पिके पूर्णतः नष्ट झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, अमरावती, बुलडाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, "हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला", आणि शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली जात आहे.