रायगडमध्ये चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम

रायगड :- जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जलभराव झाला आहे. काही रस्त्यांवर झाडे
कोसळल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने बुधवारीही (२८ मे) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
२४ तासांत १६० मिमी पावसाची नोंद
गेल्या चार दिवसांपासून सुरू
असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर थोडी विश्रांती घेतली, मात्र या दरम्यानही २४ तासांत १६० मिमी पावसाची नोंद झाली. अलिबाग, मुरुड आणि म्हसळा येथे सर्वाधिक पाऊस पडला आहे.
२७३ घरांचे नुकसान; महावितरणही प्रभावित
या पावसामुळे २६० पक्की आणि १३ कच्ची घरे नुकसानग्रस्त झाली आहेत. याशिवाय, २ प्राथमिक आरोग्य केंद्रे, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्री युनिट्स यांनाही मोठा फटका बसला आहे.
विद्युत पुरवठा खंडित होऊन महावितरणची यंत्रणाही प्रभावित झाली आहे. प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहेत.
प्राणीहानी आणि नद्यांची स्थिती
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, पनवेल, माणगाव, सुधागड पाली या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर
मालमत्ता हानी झाली आहे. एक म्हैस आणि एक बकरी विजेचा शॉक
बसून मृत्यूमुखी पडली आहेत. दरम्यान, नद्यांच्या पातळीत वाढ झाली असली तरी एकही नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
समुद्र उफाळला; लाटांची उंची ४.५ मीटरपर्यंत
पावसाळ्यात १८ वेळा उधाणाची भरती होणार आहे. यावेळी चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून २८ मे रोजीही उंच लाटांचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मंगळवारी अलिबाग किनाऱ्यावर भरतीच्या वेळी समुद्राने रौद्ररूप धारण केले होते.