विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण योजना, पण माहितीचा अभाव!
.jpeg)
पुणे – राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन
देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली मोफत शिक्षण योजना अजूनही विद्यार्थिनींपर्यंत
पोहोचत नसल्याचा धक्कादायक अहवाल ‘स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड्स’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. योजनेबाबत माहितीचा
अभाव, प्रचाराची कमतरता आणि शासकीय यंत्रणा व महाविद्यालयांत
समन्वयाचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थिनी या योजनेपासून वंचित राहत आहेत. या
संस्थेने राज्यातील विविध महाविद्यालयांतील २०० विद्यार्थिनींवर सर्वेक्षण करून हा
अहवाल सादर केला. या सर्वेक्षणात ६२.५% विद्यार्थिनींना योजनेबाबत कोणतीही माहिती
नव्हती, तर काहींना मिळालेली माहिती अपुरी होती. फक्त ४६%
विद्यार्थिनींनी शासकीय पातळीवरून माहिती मिळाल्याचे नमूद केले.
महत्त्वाचे निष्कर्ष:
- 85% विद्यार्थिनींना महाविद्यालय
प्रशासनाकडून शुल्कमाफीबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही.
- ७९.५%
विद्यार्थिनींनी शासकीय पोर्टलवर अर्ज केला, पण
त्यात अनेकांना तांत्रिक अडचणी आल्या.
- बहुतांश
महाविद्यालयांनी या योजनेचा प्रचार केला नाही.
पालक संभ्रमात:
दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू असताना
देखील अनेक पालकांना या योजनेबाबत माहिती नाही. शैक्षणिक संस्था योजनेबाबत स्पष्ट
माहिती देत नसल्यामुळे पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने
जनजागृतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
संस्थेच्या मागण्या:
- योजनेचा
लाभ खासगी व अभिमत विद्यापीठांनाही मिळावा
- पदव्युत्तर
अभ्यासक्रमांनाही योजनेचा समावेश करावा
- अर्ज
प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत असावी
- प्रवेशावेळीच
तत्काळ लाभ विद्यार्थिनींना मिळावा
- सर्व
अभ्यासक्रमांना लाभ लागू करावा
कुलदीप आंबेकर, संस्थापक, स्टुडंट
हेल्पिंग हॅण्ड्स यांचे मत:
“मुलींना मोफत शिक्षण
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. पात्र
विद्यार्थिनींना थेट प्रवेशावेळी मोबदला किंवा शुल्क परतावा मिळावा आणि
महाविद्यालयांनी योजनेबाबत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक असावे.”