त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, आसाममध्ये पुरस्थिती गंभीर – अनेक मृत्यू, रस्ते खचले

भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये निसर्गाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे मंगन जिल्ह्यात लाचेन आणि लाचुंगसारख्या दुर्गम भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले असून, भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. तिस्ता नदी दुथडी भरून वाहत असून, संगकलांग बेली ब्रिज अंशतः खराब झाला आहे. सीमा रस्ते संघटना (BRO) मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. पूर्व सिक्कीममधील नीमचेन प्रेमलखा भागातही भूस्खलन झाले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. लाचेनमध्ये ११२ आणि लाचुंगमध्ये १३५० पर्यटक अडकले आहेत. त्रिपुरामध्ये अवघ्या तीन तासांत २०० मिमी पाऊस पडल्याने अगरतळा शहरात पाणी साचले आहे. मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या निवासस्थानासमोर लोक गुडघ्यापर्यंत पाण्यात चालताना दिसले. मणिपूरमध्ये गेल्या ४ तासांत आलेल्या पुरामुळे ३,०२ लोक प्रभावित झाले असून ८८३ घरांचे नुकसान झाले आहे. इंफाळ आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यात नदीचे बंधारे फुटल्यामुळे अनेक भागात पाणी घुसले आहे.नागालँडमध्ये कोहिमा-माओ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ वर फेस्सामा भागात रस्ता कोसळला आहे. रस्त्याचा काही भाग सुमारे चार फूट खोल गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोहिमाचे उपायुक्त बी. हेनोक बुचेम यांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा सल्ला दिला आहे. आसाममध्ये गुवाहाटी जवळील दायमुगुरी भागात भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सखल भागात राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सिलचरमध्ये ४२ सेमी, करीमगंजमध्ये ३५ सेमी आणि हैलाकंडीमध्ये ३० सेमी पावसाची नोंद झाली आहे. गुवाहाटी जिल्ह्यात भूस्खलनामुळे आठ लोकांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या आपत्तींवर दुःख व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारांना तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना देखील पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले.