शेतकरी बांधवांनी ए आय तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन वाढवून प्रगती करावी

श्रीपूर : शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेतीपद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि विशेषतः एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस उत्पादनात वाढ करून प्रगती साधावी, असे आवाहन नेटाफिम कंपनीचे कृषी तज्ज्ञ अरुण देशमुख यांनी केले. 'भविष्यातील ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाची भूमिका' या चर्चासत्राचे आयोजन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, व्हीएसआय पुणे, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात “एआय तंत्रज्ञान – भविष्यातील ऊस शेती” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक होते. यावेळी व्यासपीठावर कृषी तज्ज्ञ अरुण देशमुख, शास्त्रज्ञ अनिल मुंडे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ संतोष कारंजे, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, ज्येष्ठ संचालक दिनकर मोरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी एआय तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली. ऊस गळीत व साखर उत्पादनात घट; एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा – देशमुख अरुण देशमुख म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात ऊस गळीतात २१ टक्क्यांची घट आणि साखर उत्पादनात २६ टक्क्यांची घट झाली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, यावर उपाय म्हणून एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.” ते पुढे म्हणाले, “एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस पिकाला किती पाणी द्यायचे, कोणते खत वापरायचे, कोणती फवारणी करायची, पिकावर कोणता रोग होऊ शकतो याची अचूक माहिती मिळते. त्यामुळे पाणी आणि खर्च वाचतो, आणि उत्पादनात वाढ होते.” पांडुरंग कारखान्याचे कार्य कौतुकास्पद देशमुख यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांपासून पांडुरंग साखर कारखाना सभासदांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज कारखान्याचे ऊस उत्पादन सरासरी १२३ टक्क्यांवर पोहोचले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.” शास्त्रज्ञांचाही सकारात्मक संदेश शास्त्रज्ञ संतोष कारंजे आणि अनिल मुंडे यांनीही एआय तंत्रज्ञानाच्या शेतीतील उपयोगाबाबत सखोल माहिती दिली. त्यांनी या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, खर्च आणि नियोजन कसे सुधारू शकते, याचे उदाहरणासह विवेचन केले. या चर्चासत्राला कारखान्याचे मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष कैलास खुळे यांनी सर्वांचे आभार मानले.