दिलीप दोशी यांचे निधन; भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान क्रिकेट विश्वाला मोठा धक्का

लंडन :- भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान क्रिकेटविश्वाला दु:खद बातमी मिळाली आहे. भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी (वय ७७) यांचे लंडनमध्ये निधन झाले आहे. दोशी यांच्या कौटुंबिक मित्राने ही माहिती दिली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत दोन दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन झाल्याची दु:खद वेळ क्रिकेटविश्वावर ओढवली आहे. दिलीप दोशी यांच्या आधी इंग्लंडचे डेव्हिड लॉरेन्स यांचेही निधन झाले.

 

दिलीप दोशी यांची कारकीर्द:

दिलीप दोशी हे वयाच्या ३२ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण करणारे निवडक क्रिकेटपटूंपैकी एक होते. त्यांनी १९७९ ते १९८३ या काळात भारतासाठी ३३ कसोटी सामने खेळले आणि ११४ बळी घेतले. यात ६ वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम त्यांनी केला.

तसेच, १५ एकदिवसीय सामन्यांत २२ बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १९६८-६९ मध्ये पदार्पण केले आणि १९8६ मध्ये निवृत्ती घेतली. या काळात त्यांनी २३८ सामने खेळून ८९८ बळी घेतले. त्यात ४३ वेळा पाच बळी आणि ६ वेळा दहा बळी अशी प्रभावी कामगिरी होती. त्यांनी बंगाल आणि सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले.

क्रिकेटविश्वात शोककळा:

बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले, “दिलीप दोशी हे केवळ एक महान क्रिकेटपटू नव्हते, तर एक सज्जन व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे प्रामाणिकपणा, निर्मळ मन आणि खेळाप्रती समर्पण सदैव स्मरणात राहील.”