देशात पुन्हा कोरोनाचा धोका, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

नवी दिल्ली : काही महिन्यांच्या
विश्रांतीनंतर देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात 2,710
सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यातील सर्वाधिक 1,147
रुग्ण केरळमध्ये आहेत. 25 मे रोजी
रुग्णसंख्येत अचानक पाचपट वाढ झाली होती, ज्यामध्ये एकाच
दिवशी 1,000 चा टप्पा ओलांडण्यात आला. गेल्या 24 तासांत सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात दोन तर दिल्ली,
गुजरात, कर्नाटक, पंजाब
आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नोंदवले गेले आहे.
राज्यानुसार रुग्णसंख्या:
- केरळ : 1,147
- महाराष्ट्र : 424
- दिल्ली : 294
- गुजरात : 223
- कर्नाटक
व तामिळनाडू
: प्रत्येकी 148
- पश्चिम
बंगाल
: 116
राजधानी दिल्लीमध्येही यंदाचा पहिला मृत्यू नोंदवला गेला असून, 24 तासांत 56 नवीन रुग्णांची भर पडली आहे. सध्या दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या 294 आहे. दरम्यान, गाझियाबाद जिल्ह्यातही पाच नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 झाली आहे.
काळजी करण्याची गरज नाही –
मुख्यमंत्री रेखा गुप्ता
कोरोना रुग्णसंख्येतील वाढीबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता
यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कोरोनाची परिस्थिती सरकारच्या पूर्ण नियंत्रणात
आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था
करण्यात आली आहे. नागरिकांनी फक्त आवश्यक ती खबरदारी घ्यावी," असे त्यांनी सांगितले.