रायगडच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत संघर्ष

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले जावे यासाठी भाजपच्या आमदारांनाही विश्वासात घेण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला होता. आदिती उटकरे या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात दवळाढवळ करतात, जिल्हा नियोजनचा निधी योग्य प्रमाणात देत नाहीत, आमदारांच्या कामाचे श्रेय घेतात, असे आरोप शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी त्यावेळी केले होते. शिवसेना आमदारांच्या पक्षांतर्गत उठावाला रायगडचे पालकमंत्री पद हे तात्कालिक कारण ठरले होते. याच वादामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांनी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळू दिले नव्हते, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष यास कारणीभूत ठरला होता. या वादाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटले होते.

कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कग्रेिसच्या सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेले होते. अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे महेंद्र थोरवे निवडून आले. पण निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतर महेंद्र थोरवे आणि तटकरे कुटुंबीयात शाब्दिक चकमकी झडत राहिल्या. त्यामुळे दोन्ही घटक पक्षातील वाद पुमसत राहीला.

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास विभागाचा, तर गोगावले यांना फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. गोगावले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच, शिवसेनेच्या आमदारांनी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी गोगावले यांच्यासाठी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. आदिती तटकरे यांना कुठल्याही परिस्थितीत रायगडचे पालकमंत्रीपद दिले जाऊ नये यासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. माजपच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. भरत गोगावले यांनी रायगडमध्ये येताच रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पारडे जड आहे. आणि हे पालकमंत्रिपद आमच्याचकडे राहावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे म्हटले आहे.

आदिती तटकरे यांनी अथवा खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सुनील तटकरे यांचे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सध्याचे स्थान लक्षात घेता ते सहजासहजी ते जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडणार नाहीत असे राजकीय विश्लेषकांना वाटते आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.