निधी उशीराच्या तक्रारींनी महायुती सरकारची कोंडी; लाडकी बहीण योजनेवर राजकीय संघर्ष

मुंबई : महायुती सरकारला सत्तेत आणण्यात मोठी भूमिका बजावलेल्या लाडकी बहीण योजनेवर आता सरकारमधीलच मंत्री नाराजी व्यक्त करत आहेत. शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे म्हटले, "इंदापूर तालुक्यात मी नेहमी जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र लाडक्या बहिणींमुळे निधी यायला उशीर होतो आहे. थोडा उशीर झाला तरी आता गाडी हळूहळू पूर्ववत येते आहे." दरम्यान, या वक्तव्यासंदर्भात विचारले असता मंत्री छगन भुजबळ यांनीही योजनेमुळे इतर योजनांना पैसे मिळण्यात उशीर होत असल्याची कबुली दिली. भुजबळ म्हणाले, "यात लपवण्यासारखं काही नाही. घरात अचानक मोठा खर्च आला तर परिस्थिती बदलते. लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ४५,००० कोटी रुपये बाजूला काढावे लागतात. त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतो. पहिले कशाला प्राधान्य द्यायचे, हे सरकारने ठरवायचे असते." या विधानांमुळे महायुती सरकारमधीलच अजित पवार यांच्या पक्षातील मंत्र्यांनीच या योजनेवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट होत आहे. भरणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले, "भरणे यांच्या अपेक्षा काय आहेत, याची मी माहिती घेईन." लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातून मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग करण्यात आला होता. यामुळे आधीही वाद निर्माण झाला होता. आता खुद्द सत्ताधारी मंत्र्यांच्या तक्रारीमुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.