भाजप महायुती सरकारचा स्मार्ट मीटर कायदा, अदानींचा फायदा, जनतेच्या खिशावर दरोडा, आत्ता या विरोधात जनता रस्त्यावर उतरलीच पाहिजे : खासदार प्रणिती शिंदे
.jpeg)
सोलापूर :- लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भांबेवाडी व नजीक पिंपरी गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उजनीच्या पाण्याने नजीक पिंपरीतील तलाव भरून घेणे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाढविणे तसेच इतर अपूर्ण कामे, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही महावितरणकडून सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सक्तीचा आणि दडपशाहीचा वापर करून बेकायदेशीरपणे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. महावितरणचे कर्मचारी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता घरोघरी स्मार्ट मीटर लावून जवळपास बारा हजार रुपये ग्राहकांकडून टप्प्याटप्प्याने वसूल करणार आहेत. जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना केवळ अदानी आणि इतर खासगी कंपन्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्मार्ट मीटरच्या नावाखाली जनतेची लूट सुरु आहे. या प्रकारामुळे भाजप महायुती सरकारचा प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला आहे. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले आहेत, त्यांना पूर्वीपेक्षा कित्येक पट वाढीव वीज बिल येत असून त्याची जबरदस्तीने वसुली सुरू आहे. त्यावर प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांना अधिकाऱ्यांकडून अरेरावीची वागणूक दिली जाते आणि वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
अदानी व इतर कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही. भाजप महायुती प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या या स्मार्ट मीटर योजनेला आमचा तीव्र विरोध आहे. नागरिकांनी स्मार्ट मीटर बसवून घेऊ नये, त्याला ठाम विरोध करावा. जनता जागृत राहिली नाही, तर अशा कंपन्यांमार्फत सरकार आपलीच लूट करत राहणार आहे. या अन्यायाविरोधात आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने या लुटीविरोधात रस्त्यावर उतरून लढाईसाठी सज्ज रहावे, असे आवाहन केले आहे. या गावभेट दौऱ्यात मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, सरपंच मगरधन साबळे, सरपंच मीराताई गायकवाड, मा. सरपंच केशव वाघचवरे, रामदास पाटील, काकासाहेब पाटील, फुलचंद सरवदे, कृष्णदेव वाघमोडे, दिलीप पाटील, दास साबळे, नंदकुमार आरेकर, विलास घोडके, युवराज चव्हाण, वसंत चव्हाण, तात्या पाटील, रामचंद्र गडदे, वाघचवरे सर, गरड सर, लोखंडे मॅडम, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.