सावधान... पुढील दोन दिवस तापमान वाढणार..

पुणे  : भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तवली आहे. याबाबतचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने आज मंगळवार (२५) आणि बुधवारी (२६) मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या कोकण भागातील इतर शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी मंगळवारी सांगितले की, पुढील दोन दिवस तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.