बदलापूर एन्काऊंटर फेक -उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका
.jpeg)
मुंबई: बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
बदलापुरात एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता.
एका दुसऱ्या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असे फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे, असे अहवालात म्ह
टले आहे.