शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंचा अन्नत्याग – वजन घटलं, रक्तदाब वाढला!

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार
बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग
व इतर दुर्बल घटकांच्या विविध मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अमरावती जिल्ह्यातील
गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज यांच्या समाधीस्थळी सुरू असलेल्या या आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्य तपासणीत प्रकृती चिंताजनक
बच्चू कडू यांचे वजन ४ किलोने घटले असून रक्तदाब
वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तीवसा उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने त्यांची
तपासणी केली असून, त्यांनी उपोषण थांबवावे,
असा सल्लाही दिला आहे. मात्र आपल्या मागण्यांवर ठाम राहत बच्चू कडू
यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राज्यभरातून पाठिंबा, सरकारवर दबाव
शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हे आंदोलन सुरू असून, मोठ्या संख्येने समर्थक आंदोलनस्थळी हजर आहेत. राज्यभरातून या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे राजकीय महत्त्व देखील वाढले आहे. राजकीय वर्तुळातही या आंदोलनाची दखल घेतली जात असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी कडूंना पाठिंबा दर्शविला आहे.