शेतकऱ्यांसाठी एकच ठिकाणी सर्व सुविधा; राज्यभर कृषी मॉल संकल्पनेची तयारी

मुंबई राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारण्यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. हे धोरण सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित असेल. यामुळे शेतकऱ्यांना कृषीच्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्याच ठिकाणी आपला कृषीमाल विक्रीसाठी ठेवता येईल. कृषी भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूरात कृषी मॉल आणि कृषी भवन उभारणार कोकाटे म्हणाले की, दक्षिण सोलापूर तालुक्यात कृषी भवन व बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉलद्वारे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळेल, तसेच शहरातील नागरिकांना शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य यांसारखे उत्पादन माफक दरात मिळतील. राज्यात ‘एक पीक एक गाव’ संकल्पना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील कृषी विभागाकडे असलेल्या जमिनींवर कृषी मॉल उभारले जातील. यामध्ये शेतकऱ्यांना कृषी माल विक्री आणि लागणारे साहित्य, बियाणं, खत, औषधे व मशिनरी उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर एक पीक एक गाव’ या संकल्पनेवरही कृषी विभाग विचार करत आहे. सांगलीच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयासाठी निधी सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठ येथे काम सुरु होण्यासाठी तात्काळ निधी वितरीत करावा, अशी सूचना कृषिमंत्र्यांनी दिली.